विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,
प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।
काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,
राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।
भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि
अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।
विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया
घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।
सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी
मी सुखी होईन मित्रा, तू ही सुखी होवून जा ।
सर्व काही होत नसते, वाटते व्हावे जसे,
जीवनाचे सार हे, तू ही सख्या समजून जा ।
भेट झाली जीवनी जर फिरुनि केंव्हा तरी
मित्र म्हणुनच भेटू या, प्रीतिला विसरून जा ।
Thursday, March 1, 2012
Sunday, November 6, 2011
प्रेमाला रंग असावा

प्रेमाला रंग असावा,
प्रेमाला गंध असावा,
प्रेम मन मोरच व्हावा,
थुई थुई नाचत जावा ।
अंगणी जुई फुलावी,
पारिजात वृष्टी व्हावी,
वा-याच्या झुळुके सरसा
टप,टप,टप पाउस यावा ।
गुलाबी अन सोनेरी,
चांदण्या सम चंदेरी,
हरळीच्या हिरवाईसा
चहूकडे पसरत जावा ।
सोनेरी सकाळ व्हावी,
रुपेरी रात्र असावी,
केशरी सायंकाळी
अचानक प्रियकर यावा ।
पक्षांची किलबिल गाणी,
भ्रमरांची मधु गुणगुणणी
प्रेमाचा मृदु कलरव तो
ह्रदयी अनुनादत रहावा ।
Saturday, August 6, 2011
आठवणींच्या चिमण्या

आठवणींच्या चिमण्या
भिरभिरतात मनाच्या अंगणांत
टिपतात दाणे मागल्या क्षणांचे,
दिवसांचे, महिन्यांचे अन वर्षांचे सुध्दा .
केंव्हा घेतला होता आईनं पापा
गालांवरचे अश्रू पुसून
किंवा दिला होता निळा पेन बाबांनी
मला आवडतो म्हणून
केंव्हा ऐकता ऐकता वाटलं होतं
अपरूप दादाच्या कवितांचं
केंव्हा वाटली होती असूया
अक्काची न बोलता सारं कळण्याची
केंव्हा केली होती अण्णाशी भांडा भांडी
केंव्हा घातला होता मिंदू ला धपाटा
केंव्हा गैलरीतून बघितलं होतं त्या देखण्याला
केंव्हा पुढे केला होता बोरं भरला हात
केंव्हा झालं होतं कौतुक, अन्
केंव्हा झाला होता राग राग.
केंव्हा पडल्या होत्या अक्षता अन् कळसाचं पाणी
केंव्हां फुलली होती बाग
केंव्हा लावलं होतं प्रेमाचं रोप
केव्हा बहरलं ते फुला फळांनी
चिमण्या बाळाच्या चिमण्या मुठी
पावलांच्या मऊ मऊ करंज्या
काजळ, तीट, जॉन्सन बेबी पावडर,
अमूल स्प्रे
वाढती पाउलं, लहान होणारे बूट,कपडे
त्यांचं मोठं अन वेगळं होणं
किती किती दाणे संपतच नाहीत
मीच येते अचानक भानावर, अन् येते अंगणातून घरांत .
Saturday, March 5, 2011
आस
रात्रीतल्या सुरांचे आवर्त क्षीण झाले
माझे ही हात थकले अन् ताल स्तब्ध झाले ।
शब्दच पेंगुळले, आवाज ते विराले
अन् नाद ब्रम्ह अवघे जणु काय मूक झाले ।
कुठल्या सुरेल गावीं, ही पाखरे स्वरांची
गेली उडून आणि हे गाव दग्ध झाले ।
ही शांतता भकास जाणीव गोठलेली
हे बधिर मूक कुठले गावांत आज आले ।
गेलीस तू निघून, मी एकटाच उरलो
अस्तित्व आज माझे मी ही नकारलेले ।
कुठल्याही क्षणि ते येतील स्वर फिरून
येशील तू ही गात ते गीत विसरलेले ।
ही आस मम मनांत बघ तेवतेच आहे
तू ही तिला पुरव ना ते स्नेह राखलेले ।
माझे ही हात थकले अन् ताल स्तब्ध झाले ।
शब्दच पेंगुळले, आवाज ते विराले
अन् नाद ब्रम्ह अवघे जणु काय मूक झाले ।
कुठल्या सुरेल गावीं, ही पाखरे स्वरांची
गेली उडून आणि हे गाव दग्ध झाले ।
ही शांतता भकास जाणीव गोठलेली
हे बधिर मूक कुठले गावांत आज आले ।
गेलीस तू निघून, मी एकटाच उरलो
अस्तित्व आज माझे मी ही नकारलेले ।
कुठल्याही क्षणि ते येतील स्वर फिरून
येशील तू ही गात ते गीत विसरलेले ।
ही आस मम मनांत बघ तेवतेच आहे
तू ही तिला पुरव ना ते स्नेह राखलेले ।
Thursday, November 4, 2010
दिवाळी
काळी जरतारी रात्र
रात्र अशी अवसेची
लख लख लाख दिवे
रात्र भासे दिवसाची ।
दारी तोरण स्वागता
अंगणांत रंगावली
शोभे आकाश कंदील
अन् दिव्यांच्या आवली ।
पूजेची तयारी सारी
फुलें उदबत्त्या दिवे
पंच पक्वान्नाची ताटे
गंध, सुगंध बरवे ।
नववधू लक्षुमी ही
आज सजली झोकांत
नाकी नथ, गळा सरी
तोडे, पाटल्या हातांत ।
पैठणी ल्यायली नवी
मोर राघू सजलेले
सासू सासरे दीरांच्या
नेत्री कौतुक दाटले ।
आनंदी आनंद माझ्या
अंगणात ही मावेना
ओसंडून वाही सुख
त्याचा जोर सोसवेना ।
आज दिवाळी च्या दिनी
तुला मागते लक्षुमी
घरी दारी सर्व दूर
राहो आनंद दाटूनी ।
दृष्ट न लागो कुणाची
माझ्या सुखाच्या संसारी
राहो सर्वजण सुखी
माझे घरी अन् शेजारी ।
रात्र अशी अवसेची
लख लख लाख दिवे
रात्र भासे दिवसाची ।
दारी तोरण स्वागता
अंगणांत रंगावली
शोभे आकाश कंदील
अन् दिव्यांच्या आवली ।
पूजेची तयारी सारी
फुलें उदबत्त्या दिवे
पंच पक्वान्नाची ताटे
गंध, सुगंध बरवे ।
नववधू लक्षुमी ही
आज सजली झोकांत
नाकी नथ, गळा सरी
तोडे, पाटल्या हातांत ।
पैठणी ल्यायली नवी
मोर राघू सजलेले
सासू सासरे दीरांच्या
नेत्री कौतुक दाटले ।
आनंदी आनंद माझ्या
अंगणात ही मावेना
ओसंडून वाही सुख
त्याचा जोर सोसवेना ।
आज दिवाळी च्या दिनी
तुला मागते लक्षुमी
घरी दारी सर्व दूर
राहो आनंद दाटूनी ।
दृष्ट न लागो कुणाची
माझ्या सुखाच्या संसारी
राहो सर्वजण सुखी
माझे घरी अन् शेजारी ।
Monday, October 4, 2010
मन
मन सुसाट पळते
मला नको तिथे नेते
नको नको मी म्हणता
नको तेच दाखवते ।
मन माजवते मनीं
किती काहूर काहूर
नाही नही ते विचार
करून हुर हूर ।
मन किती हे चपळ
जसे हरिण हरिण
क्षणि इथे क्षणि तिथे
ह्याचे कठिण कठिण ।
मन नाठाळ नदी से
वाहावते दूर दूर
बांध तोडून आणते
सर्वत्र महापूर ।
मन वा-या संगे नाचे
मन भिजे पावसांत
मन कधि हो ढगाळ
कधी तापते उन्हांत ।
ह्या मनाचे नाही खरे
ह्याचा लागेच ना ठाव
कधी वाटे जवळचे
कधी राखे दुजा भाव ।
मला नको तिथे नेते
नको नको मी म्हणता
नको तेच दाखवते ।
मन माजवते मनीं
किती काहूर काहूर
नाही नही ते विचार
करून हुर हूर ।
मन किती हे चपळ
जसे हरिण हरिण
क्षणि इथे क्षणि तिथे
ह्याचे कठिण कठिण ।
मन नाठाळ नदी से
वाहावते दूर दूर
बांध तोडून आणते
सर्वत्र महापूर ।
मन वा-या संगे नाचे
मन भिजे पावसांत
मन कधि हो ढगाळ
कधी तापते उन्हांत ।
ह्या मनाचे नाही खरे
ह्याचा लागेच ना ठाव
कधी वाटे जवळचे
कधी राखे दुजा भाव ।
Saturday, September 11, 2010
गणपति बाप्पा मोरया

लागला रे होता केंव्हांचाच ध्यास
आज माझी आस पुरविली ।
किती दिवसांनी आला देवा घरी
आनंद संसारी दाटियेला ।
यावे यावे देवा, स्वागत तुमचे
दाराशी तोरण नारळाचे ।
पाया वर घालू दूध आणि पाणी
प्रवासाचा शीण घालवाया ।
आसन देऊन स्थापना करूया
मखर सुंदर सजविले ।
सुगंधी जलाने स्नान करवू या
नवी आभरणें तुज लागी ।
चंदनाची उटी कस्तुरी तिलक
मस्तकी शोभती जवा फुले ।
दुर्वांची जुडी देईल थंडावा
मोदक प्रसादा ठेवियले ।
पूजा, प्रार्थना, धूपाचा सुगंध
आरती ओवाळू पंचदीप ।
गोड हे मानावे, आतिथ्य रे बाप्पा
आता तूज घालू दंडवत ।
Subscribe to:
Posts (Atom)