Saturday, September 11, 2010

गणपति बाप्पा मोरया



लागला रे होता केंव्हांचाच ध्यास
आज माझी आस पुरविली ।
किती दिवसांनी आला देवा घरी
आनंद संसारी दाटियेला ।
यावे यावे देवा, स्वागत तुमचे
दाराशी तोरण नारळाचे ।
पाया वर घालू दूध आणि पाणी
प्रवासाचा शीण घालवाया ।
आसन देऊन स्थापना करूया
मखर सुंदर सजविले ।
सुगंधी जलाने स्नान करवू या
नवी आभरणें तुज लागी ।
चंदनाची उटी कस्तुरी तिलक
मस्तकी शोभती जवा फुले ।
दुर्वांची जुडी देईल थंडावा
मोदक प्रसादा ठेवियले ।
पूजा, प्रार्थना, धूपाचा सुगंध
आरती ओवाळू पंचदीप ।
गोड हे मानावे, आतिथ्य रे बाप्पा
आता तूज घालू दंडवत ।

Saturday, September 4, 2010

पाऊस कविता

’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि माझ्या (’गोळे काका’ यांच्या) हाती तिची सूत्रे दिली.

मी माझी साखळी जोडून, आशा जोगळेकर आणि तुषार जोशी यांना खो देत आहे.

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

प्रशांतचे कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशाआंतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

क्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

गोळे काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात!

नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

.तुषार चे उत्तर छंद भुजंग प्रयात्

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

तुषार चा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.

माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली,महक आणि शामली ला

महक चे उत्तर
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.
http://mehhekk.wordpress.com/