Monday, December 14, 2009

क्षणिका

ठिणगी
मनाच्या सोपाना वरून
ह्रदया च्या गाभा-यात उतरलाय सूर्य
आंत बाहेर दाटून राहिलाय फक्त प्रकाश
ह्या प्रकाश पर्वात मीही झालेय एक ठिणगी ।

कविता
काळ्या काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करावी
तसे मनांत विचार
लखकन् वीज चमकावी तशी येते कल्पना
अन् सर सर पाउस यावा तशी येते कविता ।

निर्बंध मन
बेधुंद निर्बंध पावसाळी नदी सारखं
ओढाळ मन
प्रेमाच्या अनावर वा-या नी झपाटलेलं
पूर ओसरल्यावर त्या नदीच्या परिसरा सारखंच
सर्व उध्वस्त करून जाणारं ।

Saturday, November 14, 2009

एखादा दिवस

एखादा दिवस असा येतो
जेंव्हां सार जमून जातं
सकाळी दार उघडून गच्चीवर आलं कि
कुंडीतलं उमलेलं गुलाबाचं फूल हसून स्वागत करतं
चहा झक्क जमलाय असं आपल्या मनांत येतं न येतं
तोच पतिराजां ची सूचक मान हलते
भाजी वाला ताजी भाजी देतो
पोस्टमन हवं असलेलं पत्र आणतो ( हवी ती ई-मेल येते)
कामं ठरवून बाहेर पडलं कि ती हमखास होतात
अतिशय प्रिय मैत्रिण अचानक भेटते
संध्याकाळ चा खास पदार्थ मस्त जमतो
जेवायला बाहेरच जाउया असं ठरतं
एकादा झक्क सिनेमा, मस्त जेवण अन मीठा पान
असं साधून झोपायला जाताना मनांत विचार डोकावतो
आज आपला वाढदिवस तर नव्हता ?

Monday, November 9, 2009

आशा निराशा

सर्रकन् ढगांनी भराव आभाळ
अन् काळ्या काळ्या अभ्रांनी
सूर्यास झाकून टाकावं
तशीच झाकोळते निराशा मनाला
अन् ग्रासून टाकते सारे प्रसन्न विचार ।

ह्रदय कसं मलूल पडतं
अन् चेहेरा चिंतातुर
कां ? कसं ? कुठे ? केंव्हां ?
प्रश्नांच्या उत्तरांना मन आतुर ।

पण हे सर्व ही सोसायचंय धीरानं
कारण ढगा आडून सूर्य येतोच बाहेर
तसंच निराशेचं हे मळभ होणारच दूर
अन् आशेचा सूर्य देणारच आहेर ।

Monday, November 2, 2009

एकचि तो भगवान

एक ध्यास, एक ध्यान
एक मन एक प्राण ।
एक ठेव, एक देव
त्याची किती तरी नाव ।
त्याला तुम्ही म्हणा कृष्णा
तोचि तृप्ती, तोचि तृष्णा ।
त्याला म्हणावे का राम
देतो जिवाला आराम ।
त्याला म्हणू या शंकर
तोचि सखा निरंतर
त्याला म्हणावे का हरी
फुंकी प्राणाची बासरी ।
कोणी त्याला म्हणे दत्त
सदा त्याच्या पायी चित्त ।
त्याला विठ्ठल म्हणूया
गुण गाउनी वर्णू या ।
जरी माया असे हवी
तिला मानावे का देवी ।
अंबा तुळजा लक्ष्मी
सदा वसतात मनी ।
मरियम पुत्र येशू म्हणा
बुध्द, महम्मद, माना ।
एक सर्व माझ्या लेखी
भाव असूद्या अनेकी ।
नावें किती विद्यमान
एकचि तो भगवान ।

Thursday, October 15, 2009

दिवाळी


घोर तिमिरात अवसेच्या
दिवे उजळू मांगल्याचे
संवादाच्या प्रकाशाने
घालवू अंधार अ-समजांचे ।
झटकू जाळी द्वेषा ची
झाडुन काढू राग लोभा
घालू रांगोळी सुखाची
सडा शिंपू सु- बोलांचा ।
मग सुख येइल दारी
लक्षुमि येईल माहेरी
आनंदाच्या प्रकाशांत
होइल दिवाळी साजरी ।

Sunday, September 20, 2009

शक्ति याचना

भद्र काली, महादुर्गा, हिमनंदिनि नमो नमः
दैत्य असुर संहारिणि, भक्त रक्षिणि नमो नमः
शक्तिरूपा, दैन्य हर्ती, शत्रु ताडिनि, नमो नमः
भक्तांस्तव आशिर्वच, दे शक्ति नमो नमः ।

आसुरि रंगात रंगले,राज्यकर्ते नमो नमः
सैन्यशक्ति, खड्ग,भाले गंजलेले नमो नमः
मोहाने डोळे ह्यांचे तारवटले नमो नमः
औढुनि आसूड करी जागृत ह्यां नमो नमः ।

शत्रु दारांत ठेपले, आंतहि लपले नमो नमः
जन सारे नाच-गाण्यांत रंगले नमो नमः
कशास्तव माझेच हे अंतर जळे नमो नमः
जागवून चेतना यां करि जागृत नमो नमः ।

पुन्हा एकदा वाहू दे वारे देश भक्तीचे
पुन्हा एकदा स्फुरु दे बाहु युवा शक्तीचे
नेत्यांना मिळू दे कसब नीति युक्ती चे
पुन्हा एकदा उजळो भाग्य या भारती चे ।

भद्र काली, महादुर्गा, हिमनंदिनि नमो नमः
दैत्य असुर संहारिणि, भक्त रक्षिणि नमो नमः

Monday, August 17, 2009

बाळ

बाळ खोड्याळ खोड्याळ
बाळ खट्याळ खट्याळ
बाळ अती खोडया करी
तरी किती लडिवाळ ।

तिचे मोठे मोठे डोळे
भारि लाडिक नि भोळे
उडते भुरु भरु
तिचे रेशमी जावळ ।

रेशमी अंगडे
अन रेशमी सोवळ
हाती पायी अलंकार
अन् गळ्यात पोवळ ।

बाळ खुदुखुदु हासे
चमकती दातुरड्या
कोवळ्या ओठी दिसे
दूध रेषा ती धवल ।

न लागावी ग हिला
बाई कोणाची नजर
तीट लावा झणि गाली
आणि उतरा भाकर ।

Thursday, August 6, 2009

लेवून भूषणें ये ना


लेवून भूषणें ये ना
वेढून चांदणे ये ना
त्या तिथे नदी तीरा वर
बघू स्वप्न देखणें, ये ना ।

कधी वसंत, ग्रीष्म कधी
वर्षाऋतु, शरद कधी
प्रीती चे गूज तुझ्या
कानांत सांगणे, ये ना । लेवून....

अवखळ हसु गालांवर
उडता उन्मुक्त पदर
भिरभिरती धुंद नज़र
तोडून बंधने, ये ना । लेवून....

मोकळाच केश पाश
चालू नको सावकाश
वा-याची पाउलांत
बांधून पैंजणें, ये ना । लेवून....

हात तुझा दे हाती
गात्रें कशी थरथरती
हळुवार भावनांनी
अस्फुट बोलणें, ये ना । लेवून....

Thursday, July 16, 2009

मनातल्या मनांत

मनातल्या मनांत मी
मनातल्या मनांत तू
प्रीत कळ्या फुलविल्या
प्रेम ज्योति लाविल्या
न च तू आली कधी
न मज बोलाविलेस तू । मनातल्या मनांत
कधी हसुन पाहिले
कधी नजर चोरली
कधी हळूच लाजली
कधी गंभीर जाहली
पण मनातले खुळे
भाव जपलेस तू । मनातल्या मनांत
कधी तुझ्या वाटेत मी
कधी लाटेत राहिलो
पुस्तकें देण्या मिशें
स्पर्श इच्छित राहिलो
साहस नच केले कधी
न येवो मनांत किंतु । मनांतल्या मनांत
कधी तरी होईल सत्य
स्वप्न हें मनातले
जे जपुन ठेविले
आंत ह्रदयातले
कधी तरी येऊन जवळ
माझीच रहाशील तू । मनातल्या मनांत

Tuesday, June 16, 2009

पाऊस

पावसाळी आसमंत
कसे भरुनि आले
निळे, सावळे, काळे
ढग खवळुनि आले ।

करती गर्जना प्रचंड
वा-याचा अन् मृदंग
मत्त हत्तीच जणु
डुलत झुलत आले ।

गडगडाट, कडकडाट,
चमचमाट, लखलखाट
तडिता चाबुक उडवित
वरुण देव आले ।

कोसळती जलधारा
अन् प्रचंड तो वारा
जल थल जणु होय एक
तन, नव वसन ल्याले ।

शमले वादळ अवचित्
दिशादिशा हो पुलकित्
अभ्र छेदुनि,
रविराज प्रगट झाले ।

Wednesday, June 10, 2009

इच्छा

बाई ला अनुभव असतोच
सर्व जाणतं सोडून अजाणत्याला वरण्याचा
तोच कामी येईल बहुतेक आता येतांना तुझ्याकडे
पुरुषाला जातं त्यापेक्षा कदाचित
सोप जाईल हे जग सोडून जाणं
अन् त्या सर्वस्वी अनोख्या जगांत पाय ठेवणं
मी कल्पना करते त्या पेक्षा किती वेगळा
असू शकतोस तू
कि माझ्या कल्पनेतलाच साकार होणारेस ?
मला जाताना, हे बंध तोडतांना
किती कष्ट व्हावेत असं ठरवलं आहेस ?
किती कां असेनात, सहन होऊ दे म्हणजे झालं
आता वेळ जवळ येऊन ठेपलीय
सर्व सोडण्याची.
तेंव्हा शात पणे तुझं नाव घेत घेतच
तुझ्या कडे येणं व्हावं हीच इच्छा.

Sunday, May 24, 2009

अभ्र

कुठुनि अभ्र आले,
नभ, झाकोळुनि गेले
सूर्याचे तेज कसे
मंद मलूल झाले ।

मन फ्रफुल्ल होते ते
क्षण भरांत विझले
स्मित गालावरचे
जणु मावळून गेले ।

अपुल्या मधि जे घडले
किति सुंदर होते
फक्त एक वाक्य तुझे,
ह्रदयी डसुन गेले ।

धागा धागा मिळुनी
प्रेम गोफ विणला
पण अखेर तट,तट,तट
बंध तुटुनि गेले ।

होते जर दु:ख नशिबी
अपुल्या प्रेमाच्या
मग कशास सप्तरंगी
स्वप्न पडुनि गेले ।

Wednesday, May 6, 2009

मत

कुणाला द्यावं मत कुणाला देऊ नये ?
कुणाच्या हाती द्यावी सत्ता, कुणाला देऊ नये ?
पण निरर्थक आहे हा विचार आता
निर्णय घेण्याची वेळ केंव्हांच संपलीय
आता फक्त निकालाची प्रतीक्षा
कोण होणार भारत भाग्य विधाता
ह्या वेळी केलेल्या चुकांची नोंद घ्यायची
रोज त्यांची उजळणी करायची
मग तरी पुढच्या वेळी
बरोबर निर्णय घ्यायला
जमेल आपल्याला
अन् पश्चात्तापाची
वेळ नाही यायची.

Saturday, April 4, 2009

एकसष्टी

डोंगर माथ्या वरून उतरणीला लागून ही एक दशक उलटलं
त्यांत कितितरी कांही बाही हरवलं
पण बरंच काही मिळवलं
हरवलीय आठवण
हरवलेत कान
हरवलेत डोळे
हरवलीय शक्ती, पण
मिळवला हा निवांतपणा
वेळेचं स्वातंत्र्य
हवं ते करायची मोकळीक
जबाबदारीतून मुक्ती नव्हे
ती पार पाडल्याची तृप्ती
जबाबदारी कमी झाली
सोन-पावलांनी सुना आल्या
नातवंडांचं गोड हसू आलं
सूख ओसंडून वाहू लागलं
आजी आजोबा म्हणू लागलं
क्वचित् चष्म्याच्या आंतून ओघळलं
आता कुणी हो म्हंटलं तरी
आपण तरुण व्हायला तयार नाही
कारण प्रत्येक वयाचं एक सूख असतं
ते आपण सोडणार नाही
असेना कां हा उत्तरार्ध,
पण त्याला परिपूर्णतेचीच समाप्ती आहे .

ही कविता मी गेल्या वर्षी भेट म्हणून माझ्या मावस भावाला दिली होती. माझी एकसष्टी होऊन तर तीन वर्ष होऊन गेलीत.
गैरसमजाला कारण दिल्या बद्दल क्षमस्व. कविता सर्वांना खूप आवडली होती तर विचार केला कि करावी पोस्ट. अनुभव अर्थातच् माझेच.

Saturday, March 14, 2009

हुंदका

नेहेमीच ह्या जगाने केले हंसेच माझे
माझ्याच मग उरांत गोठले शब्द माझे ।
संधी दिलीच नाही कांहीच बोलण्याची
मग आवरू कसे मी ते ऊत भावनांचे ।
अनिवार भावना त्या डोळ्यांत दाटतात
खळ्क्न् फुटोनी कांच ते अश्रु सांडतांत ।
कढ आंत आंत जपुनि ठेवीन तप्त ज्वाला
ठरविले जरि कितीही हुंदका फुटोनी गेला ।

Friday, March 6, 2009

होळी












उधळती रंग अबीर गुलाल
गोकुळ सारे झाले लाल ।
वसंत फुलला वृक्ष वेलीं
देही लाभली नवी नव्हाळी
नैसर्गिक ती चढता लाली
झाले गाल कुणाचे लाल । उधळती...
यमुना तीरी खेळ रंगला
गोपांसव श्रीहरी दंगला
गोपीं संगे नाचे राधा
मुरली वाजवीतो नंदलाल ।उधळती...
तन धुंद अन् मन बेधुंद
लागे सर्वां एकच छंद
श्रीधर माधव गोविंद
रंगवी गोकुळास ब्रिजलाल । उधळती....

Sunday, March 1, 2009

दिनांत

संध्येच्या छटा
सागर अन् आकाश
झाला सूर्यास्त ।
अंधाराच्या गवती
चांदणीचे फूल
रात्र मलूल ।
हळू हळू येती
अनेक हसरे तारे
मध्यरात्र ।
रात्र गहिरी गहिरी
झोपली ओसरी
दिशा स्तब्ध ।
झाले झुंजुमुजु
गुलाबी केशरी
उष:काल ।

Monday, February 16, 2009

ग्रंथ आणि जिद्द

किती भीति घालतात हे ग्रंथ
भीती वार्धक्याची, अर्थहीनतेची, शक्ती--हासाची
लोळागोळा होत जाणा-या शरीराची
एका बाजूनी म्हणतात आत्मा शुध्द आहे
त्याच्यावर वाईटाचं किटाळ चढतच नाही कधी
अन् दुस-या बाजूनी भीती घालतात शरीराच्या नश्वरतेची
पाप पुण्याची, स्वर्ग नरकाची
अरे असेना का हे शरीर नश्वर, त्यांतलं मन किती छान आहे
किती भावुक, किती हळवं,किती तरुण, किती रसरसून जगणारं
तेच देईल शक्ती ह्या शरीराच्या व्यथा सोसण्याची
अन् तरीही उभं राहाण्याची शेवट पर्यंत जिद्दीनं .

Tuesday, February 3, 2009

प्रीत

सागर हा निळा आकाश ही निळं
तुझ्या डोळियांचं तळ
मीच मीन ।
शामल ढगांची आकाशात गर्दी
मीच एक दर्दी
कुंतलांचा ।
दोन क्षण भेट जिना उतरता
तुझ्याशी बोलता
लागे धाप ।
कशी ही प्रीती कुणावरी जडे
प्रेमाचे हे तिढे
न सुटती ।
मनांत न मावे आनंदी आनंद
एकच हा छंद
तव भेटीचा ।
माझ्याच सारखी तू ही कासावीस
मला तू हवीस
अन् तुला मी ।