Saturday, March 5, 2011

आस

रात्रीतल्या सुरांचे आवर्त क्षीण झाले
माझे ही हात थकले अन् ताल स्तब्ध झाले ।

शब्दच पेंगुळले, आवाज ते विराले
अन् नाद ब्रम्ह अवघे जणु काय मूक झाले ।

कुठल्या सुरेल गावीं, ही पाखरे स्वरांची
गेली उडून आणि हे गाव दग्ध झाले ।

ही शांतता भकास जाणीव गोठलेली
हे बधिर मूक कुठले गावांत आज आले ।

गेलीस तू निघून, मी एकटाच उरलो
अस्तित्व आज माझे मी ही नकारलेले ।

कुठल्याही क्षणि ते येतील स्वर फिरून
येशील तू ही गात ते गीत विसरलेले ।

ही आस मम मनांत बघ तेवतेच आहे
तू ही तिला पुरव ना ते स्नेह राखलेले ।