Tuesday, December 2, 2008

कोण आहोंत आम्ही ?



कोण आहोंत आम्ही
काय आहोंत आम्ही
प्रतिक्रियावादी आहोंत काय आम्ही

नेहेमी कुणी तरी थप्पड मारल्यावर
हात उचलायचा विचार करतो आम्ही

दुसरा जेंव्हां आक्रामक होतो
तेंव्हाच फक्त बचाव करतो आम्ही

घाबरून लहानाला, घाबरून मोठ्याला
नेहेमीच सगळ्यांना घाबरून असतो आम्ही

आमच्या सैनिकांना नसतात शस्त्रास्त्रे
गोळ्या खायला त्यांना तयार करतो आम्ही

सरकारी नेत्यांना कमांडो लागतात
जनतेला मात्र सतत ठार करतो आम्ही

हिमालया वर सैनिकांना नसतात बूट अन् जैकेटस्
इथे मात्र अनुकूल गरम-गार असतो आम्ही

पोकळ गप्पा पोकळ डौल
दाखविण्यात मात्र हुशार असतो आम्ही

Friday, October 31, 2008

जवळचा

सागर अन् आकाश
दोन्हींत जाणवतो तुझाच प्रकाश
त्यांची अथांगता, असीमता त्यांची
दोन्हींत होते तुझीच प्रचीती
एरव्ही आकलन शक्ती बाहेरचा तू
कधी कधी कित्ती जवळचा वाटतोस
एखाद्या मित्रा सारखा, आई सारखा, भावा सारखा
धावून येतोस मदतीला आमच्या
अन् कधी कधी इतका अंत पाहातोस
कि तुझ्या अस्तित्वा विषयीच वाटते शंका
आम्हा सामान्यांची नको रे घेऊस अशी परिक्षा
नको देऊस अशी कठोर शिक्षा
तसाच रहा जसा वाटतोस
जवळचा

Sunday, October 26, 2008

शुभ दीपावली

नक्षत्रांच्या ओळी उतरल्या धरेवरी
आज चांदणेच गडे पडले सोनेरी
अदम्य उत्साह राहिला बघ भरोनी
शिगोशिग मनांमनांत नगरी अन् ग्रामी

ह्या प्रकाश पर्वाचे देणे देऊ या
अंधकार कलहाचा दूरच हटवू या
सारे मिळुनी उजळू नाव भारताचे
ही दीपावली हाच अम्हां संदेश अता देते

Tuesday, October 7, 2008

उजवं डावं



जीवन सुंदर असतं तसंच कुरूप ही असतं
आपल्याला कुठलं हवंय ते जपायचं असतं.

माणूस छान असतं तसं वाईट ही असतं
कारण माणूस शेवटी माणूस असतं

बागेत फुलं असतांत तसे काटे ही असतात
काट्यांना चुकवून, फुलांना हुंगायचं असतं

जीवनांत यश असतं तसंच अपयश ही असतं
यशानं हुरळायचं नसतं, अपयशानं खचायचं नसतं

जगांत मित्र असतांत तसेच शत्रू ही असतात
त्यांतच आपल्याला जगायचं असतं

उजवं असतं तसंच डावं ही असतं
त्यात वावगं असं काहींच नसतं

जग हे असं आहे, अन् असंच असतं
आपल्यालाच मार्ग काढून पुढे जायचं असतं

Friday, September 26, 2008

ऋतुरंग

ऋतुरंग हे माझ्या दादाचं कवितांचं पुस्तक ते आम्ही ब्लॉग वर स्कैन करून टाकायचा प्रयत्न केला होता पण नीटसं जमलं नाही आता ह्या कविता रोज एक अशा ऋतुरंग ब्लॉग वर टाकणार आहोंत. कालच पहिली कविता टाकलीय. आवडते आवाज. सोबत ऑडियो पण आहे.
प्रतिसादाची अपेक्षा आहे .

Wednesday, September 24, 2008

दूर मी जातो



दूर मी जातो अता मज साद तू घालू नको
बंध हे तुटले अता त्यां गाठ तू घालू नको ।

उत्तरें देतां समाजा, लाज तुज येईल गे
जे मी केलें, ते कसें, कां, प्रश्न मज घालू नको ।

घडलेच जे अपुल्या मधे ते राहू दे गुपितांत गे
लक्तरांना प्रीतीच्या, वेशीस तू टांगू नको ।

वाट्यास जे आले म्हणावे प्राक्तनच गे आपुले
त्याच साठी ह्याला त्याला बोल तू लावू नको ।

असले जर दैवात होइल भेट ही केंव्हा तरी
वाट बघतां ओसरीला तू दिवा लावू नको ।

Friday, September 19, 2008

साखळी हायकू

मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची?) कल्पना तिला सुचली.

"साखळी हायकू"साठी नियम:
१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

मला प्रशांत कडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.

माझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:


रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)
कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी
(प्रशांत)


हायकूच्या या साखळीतली माझी कडी:

जुनं पुस्तक उघडतांच
पडला एक वाळका गुलाब
आता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब

माझा खो मेघनाला अन् सुषमाला

Friday, September 5, 2008

आठवणी

आठवणींच्या रिमझिम धारा
देती तप्त जिवा थंडावा
त्यातच मग हरवून जाता
वर्तमान कां नच विसरावा

बालपणीचे घरकुल अपुले
आई दादा ताई भाई
आणि छबकडे मिंदू नाना
गडबड बडबड घाई घाई

मी अन अण्णा अधले मधले
कुणी ही थापटा असले तबले
पण त्या कडुलिंबी फांदी ला
लोंबत असत मधाचे बुधले

ते बालपण ती तरुणाई
नव्या नव्या ची किती नवलाई
शाळा संपुन कधी उगवली
कॉलेजाची अपूर्वाई

ती कॉलेजाची नवलाई
कळले नाही कधी संपली
कधी सीनीयर झालो आम्ही
अन् पदवी ही हाती पडली

अन् पदव्युत्तर वधू परीक्षा
तीही पडली पार कधीची
सून, नववधू , काकू, वहिनी
नवीन नातीं नव जन्माची

नवरा,सासू तान्ही बाळें
उस्तवारी करणें सगळ्यांची
त्याच मधे मग हरपुन गेली
गंमत जंमत ती रात्रींची

हे सगळे करताना आले
नोकरी चे ते जू मानेवर
कधी स्वत: मी अडकवले ते
माझे मला न कळे आजवर

शिक्षण अन् लग्ने ही मुलांची
झाली ती थाटामाटाने
ती ही पाखरें उडून गेली
अपुल्या अपुल्या नव वाटेने

आज अता निवांत लाभता
आम्ही दोघे सायंकाळी
आठवीत बसतो त्या गोष्टी
घडल्या होत्या ज्या सकाळी

संसृतिच्या स्थूलांत कधी कधी
स्मृति मधाचे बिंदु चाखतो
गोडी मध्ये आठवणींच्या
दोघे मग हरवून जातो.

Wednesday, August 13, 2008

बाईचा जन्म

बाई बाईचा जन्म वगैरे, ऐकलं होतं लहानपणी
तेंव्हांच ठरवलं होतं आपण चांगलंच वागायचं

अन् जपायचं तिला. ती जी कुणी असेल
जी आपलं सर्वस्व ओवाळून टाकेल माझ्या वरून

तिला फुलागत फुलवायचं, राणी सारखं ठेवायचं
अन् आपणही भरपूर सुखांत डुंबायचं



पण हे सारं स्वप्नच राहिलं
तू आलीस सोन्याच्या पाउलांनी लक्ष्मी सारखी
पण ही लक्ष्मी केव्हढी कडक

केंव्हांही मूड जाणार,
केंव्हां ही थयथयाट होणार,
अन् केंव्हां ही माहेरी निघून जाणार.
अन मग तिथली मोठी माणसं माझे वाभाडे काढणार
घरांतून वेगळं हो म्हणणार.

हे असंच, असंच चालत राहाणार
स्वप्नांच्या ठिक-या ठिक-या झाल्या आहेत
त्याच गोळा करण्यात माझा जन्म जाणार

Monday, August 4, 2008

चूक बाईचीच

मी स्तब्ध उभी होते
तुझ्या उत्तराची वाट बघत
ते आलंच नाही, कारण ते येणार नव्हतंच
मीच खुळी, मला वाटत होतं
कि ते होकारार्थीच असेल
पण तू तिथे उगाच उभा राहिलास
वाचा गेल्या सारखा.
अन् माझे धिंडवडे काढले सा-यांनी
हवं ते, हवं तसं बोलून
माझे डबडबलेले डोळे तुला दिसलेच नाहीत
माझा प्रश्न, आपलं एकमेकां वर प्रेम आहे न्
आपण लग्न करणार आहोंत खरं ना,
अनुत्तरितच राहिला.
मी स्तब्धच उभी राहिले
अपराधी पणाचं ओझं घेऊन.
लहान पणा पासून सवयच आहे ती मला
चूक कुणाची ही असो
शिक्षा ही बाईलाच व्हायची.

Wednesday, July 30, 2008

भीती

रोज रोज भेडसावतात मला अज्ञाताच्या सावल्या
ह्रदयाची स्पंदनं वाढू लागतात दुप्पट वेगानं
अन् ते छातीतून बाहेर उडी घ्यायला बघतं
सावल्या आंत आंत आंत शिरतात
अगदी ह्र्दयाच्या गाभा-यात
मोठ्ठया, मोठ्ठया, मोठ्ठया होतात
मी हतबल, भिंतीला टेकून उभी
छप्पर कोसळण्याची वाट बघत.....
एक आवाज येतोय
असं काय करतेस, कशाला एव्हढी घाबरतेस,
ह्या सावल्या तूच तयार केल्यास, तुझ्याच मनाने
अन् तूच त्या घालवू शकशील. तुझ्यातच आहे ती शक्ती
पायातल्या मणा मणाच्या बेडया गळून पडतात
मी खिडकी उघडते
सावल्या लहान, लहान, लहान होत जातात
अगदी एक ठिपका. अन् तोही शेवटी नाहीसा होतो
मी निश्वास सोडते.
कुठे तरी ओठावर एक बारीक स्मित उमटतं.

Thursday, July 24, 2008

मनातला विठ्ठल

आषाढी कार्तीकी भक्तजन येती, त्या वारीचं आकर्षण लहानपणा पासून होतं असं म्हणता
येणार नाही, कारण बालपण, तारुण्य अन् मोठेपण सर्वच महाराष्ट्राच्या बाहेर गेलं.
नास्तिक मात्र नव्हते. माहेरी घरांत गोकुळ अष्टमी दणक्यात साजरी व्हायची. सासरी गणपती.
पण संत वाङमयातून घडलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाने विठ्ठलाचं कुतुहल मात्र खूप होतं.
वारीला गेलेल्या लोकां कडून वारी विषयी ऐकतांना वाटायचं निसंगपणाचां किती छान अनुभव
असेल हा. अन् विनम्र होण्याची तर अपूर्व संधी कारण आपलं असं काहीच न्यायचं नसतं म्हणे.
पण तो योग तर आलाच नाही पुढे कधी आला तर कुणास ठाऊक .
विठ्ठलाचं ते आकर्षण मात्र आजही कायम आहे.माझे माहेर पंढरी हा तुकारामांचा
भीमसेनां नी गायलेला अभंग ऐकला कि जीव हेलावून जातो. पंढरपूर ला मात्र दोनदा जायचा योग आला.
बडग्यांचा मात्र आम्हाला अजिबात त्रास झाला नाही. तुळशी माळ हातात घेऊन रांगेत उभं असतांना
इतकं प्रसन्न वाटत होतं. पाय मुळीच दुखले नाहीत अन् नंबर लागल्यावर विठूच्या पायावर डोकं ठेवून
अगदी भरून आलं. पण रखुमाई विठ्ठलाजवळ नव्हती. ती दुस-या देवळांत आपल्या विठोबा पासून दूर असते.
स्त्री मुक्ती प्रकार तेंवहा पासूनच चालू झाला होता कि काय. विठ्ठलाच्या देवळात एक चांदीचा खांब आहे
त्याला कवेत घेऊन अगदी गळाभेट देता येते. मी विठ्ठलाला भेटणयाची ही संधी अर्थातच् सोडली नाही.
ज्ञानेश्वरीचं हस्तलिखित ही तिथेच ठेवलेलं आहे. ज्या वास्तूला ज्ञानदेव तुकाराम वगैरे मंडळींचे पाय लागले
त्याच वास्तूत आपण आत्ता उभे आहोंत ही कल्पनाच किती छान आहे मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव काय वर्णावा.
नामदेवांच्या हातून तर विठू माउली खात ही असे. अन् जनाबाईला घरकामांत मदत करणारा तो हाच. असा हा
सामान्यांना असामान्य बनविणारा विठ्ठल मनांत नाही वसला तरच आश्चर्य. नेहेमी जवळचा वाटणारा विठ्ठल
तुकारामांना कधी कधी मात्र कानडा (समजायला कठिण) वाटतो. अन् कधी कधी अगदी मित्र कि ज्याच्यावर त्यांना
रागावता ही येतं.
एवढ्या प्रसिध्द मंदिराच्या आसपासचा परिसर अन् चंद्रभागा नदी मात्र अगदी गचाळ आहे. त्यामुळे
मन कुठेतरी खट्टू होईन जातं. पण मनांत त्या विठ्ठल भेटीचं सुख ही बरोबर असतंच.

Friday, July 11, 2008

हातभार

किती तरी हात सरसावतात पाटी वर लिहायला
पण त्यांना पेन्सिलच मिळत नाही .
किती तरी डोळे उत्सुक असतात पुस्तकांतली अक्षरं वाचायला
पण त्यांना पुस्तकंच मिळत नाहीत
किती तरी कान आसुसले असतात चांगल्या गोष्टी एकायला
पण त्यांना आजीच भेटत नाही .
किती तरी ओठ आतुरले असतात कांही तरी सांगायला
पण त्यांचं कुणी ऐकूनच घेत नाही.
किती तरी पाय तयार असतात उडी मारून पुढे जायला
पण त्यांना कुणी हातच देत नाही .
किती तरी मनं आतुर असतात लाड करून घ्यायला
पण त्यांना आईच सापडत नाही
आपण व्हायचं त्यांची आई, आज्जी, द्यायचा त्याना हात
द्यायची पाटी पेन्सिल पुस्तकं
लावायचा हातभार जमेल तेव्हढा ?

Thursday, June 12, 2008

म्हातारपण

म्हातारपणात ही सुख असतं
सुख कशाची ही घाई नसण्याचं
सुख सर्व कांही आरामशीर करण्याचं
सुख नातवंडांना दिसामाशी मोठं होतांना बघण्याचं













सुख कशाचीच जबाबदारी नसण्याचं
सुख पूर्वी केलेल्या कष्टांची फळं चाखण्याचं
सुख नवीन पिढी कडून आदर मिळविण्याचं
सुख भेगाळलेल्या टाचांवर मलम लावत बसण्याच्या निवांत पणाचं
सुख दुपारी पुस्तक घेऊन लोळत पडण्याचं
म्हातारणातही सुख असतं, फक्त ते मजे मजेनं भोगता यायला हवं.

Saturday, May 17, 2008

गम्मतिका

टाप टाप हायहील सेंडल्स
खाड खाड पायातले बूट
सपक सपक हवाई चप्पल
धाड धाड रेल्वेचा रूट

सुनामी, सायक्लोन, भूकंप
आज ह्याचा तर उद्या त्याचा संप
कशी आमची आठवण धडाची
सारे विसरून मारतो पुढे जंप


तुझ्या डोळ्यातली निरांजनं
तुझ्या गालावरचे अनार
तुझ्या हास्याच्या फुलबाज्या
माझी तर रोजच दिवाळी होणार

कडा कडा भांडतं ते प्रेम
भडाभडा बोलतं ते प्रेम
ढसाढसा रडतं ते प्रेम
अन् रडता रडता हसतं ते प्रेम

मी माझं मला
तू तुझं तुला
ते त्यांचं त्यांना
आपण आपलं आपल्याला


'टीप मागची कविता थोडी भारी वाटली ना म्हणून ह्या अगदीच हलक्या फुलक्या गम्मतिका ।

Sunday, April 27, 2008

सुख निर्वाणी


नसावी इच्छा नसावी आकांक्षा
तृप्त असावं मन
नसावा द्वेष नसावी ईर्षा
शांत असावं मन


आल्या दिवसाचं करावं उत्साहानं स्वागत
उत्साही असावं मन

आनंदानं करावं पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन

वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण
मन आनंदी असल्यावर
बाकी सारंच असेल अकारण
ब्रह्मानंदा चा अनुभव लाभेल क्षणो क्षणी
अनिर्वचनीय सुख लाभेल निर्वाणी

Monday, April 14, 2008

राम

संसार ताप विकलित, भक्तांस्तव सुखद मेघ
भुज विशाल, धनुधारी, एक वचन दगड रेघ
सुस्मित वदन, करुण ह्रदय, भक्तांचा कैवारी
सुर नर मुनि दुख हर्ता, रिपु राक्षस संहारी

राम नाम सीता-पति, विना कारण कृपाळ
आर्त ह्रदय भक्तांचा शीतल चंदन दयाळ
आदर्शच मूर्तीमंत रघुपति जो जगत्पाळ
तन, मन, धन जो अर्पी करि त्याचा तो सांभाळ

देह दिला करण्याला काम नित्य प्रति क्षणी
कारण अन् कार्य सर्व अर्पावे राम चरणी
चिंता भव-भय सारे होइल मग दूर झणि
आनंदच आनंद राहील भरुन तनी मनी

Sunday, March 30, 2008

चांद कातला

चांद कातला कुणि धरणी वर
फिरवुनि तिजला गरगर भरभर
ढग अचंभित बघत राहिले
सोनेरी चंदेरी झालर


रात्र स्तब्ध ती उभी राहिली
सावरून पदराला तत्पर
तारे धावती सैरा वैरा
न सुचून कांहीही भर भर

चांद कातला कुणि धरणीवर

हळू हळू तो चांद विरतसे
अर्ध शाम अष्टमीस वावर
आणि अमावास्येला बेटया
खुशाल काळा बुरखा पांघर

अन् मग सूर्य आपुला सुंदर
फिरवित येई सोनेरी कर
अन् अपुल्या शाश्वत मायेने
उजळी हळु हळु काळा चंदर

दरदिशि थोडा थोडा उजळित
चांद हळु हळु मोठा होई
पोर्णिमेस संपूर्ण उजळिता
प्राप्त करी निज स्वरूप सुंदर

चांद उजळतो कोण धऱेवर
चांद काततो कोण धरेवर

Monday, March 24, 2008

देह अन् प्राण

देहाच्या डबीतला प्राणांचा कापूर
केंव्हा आणि कसा उडून जातो कळत
सुध्दा नाही
डबीचं झाकण उघडं राहातं नकळत
कण कण उडत राहातो नकळत
अन् फक्त डबीच उरते
ती फेकूनच द्यावी लागते शेवटी

Tuesday, March 18, 2008

वाजते बासरी

वाजते बासरी यमुना तीरी
रंग उधळती दश-दिशां वरी

गोपी सा-या रंग खेळती
घेउनि पिचकारी करी
बघतो कौतुक श्रीहरि । वाजते बासरी…

भिजती साड्या भिजती चोळ्या
भिजती गात्रे सारी
उठती मनीं आनंद लहरी । वाजते बासरी…

प्रीत रंग मग असा उसळता
मग्न सर्व नर नारी
नसे चित्त भानावरी । वाजते बासरी….


या अपूर्व रंगात नाहती
राधा अन् गिरिधारी
नाचते गोकुळ ताला वरी । वाजते बासरी…

Friday, February 29, 2008

पाहुणा

ये ना कधी तरी पुन्हा
हो ना माझा पाहुणा ।

परत एकदा होइन मी
आतुर सखी, बावरी
राहिन खिडकीशी उभी
आकुल व्याकुळ दर्शना
ये ना कधी तरी पुन्हा

पी माझ्याच कपातुनि चहा
ऐकव तव कविता नव्या
नायका, रसिका, मोहना
लाव ना पाल्हाळ पुन्हा
ये ना कधी तरी पुन्हा

म्हण परत परत मला
दमला का माझ्या फुला
मी तुला अन् तूच मला
राहि जपुनि माझ्या मना
ये ना कधी तरी पुन्हा

पुन्हा अनुभवू जोडीनं
ते गेलेले रात दिन
ते गीत जुळवू पुन्हा
तो राग आळवू जुना
ये ना कधी तरी पुन्हा

पाहुणा

ये ना कधी तरी पुन्हा
हो ना माझा पाहुणा ।

परत एकदा होइन मी
आतुर सखी, बावरी
राहिन खिडकीशी उभी
आकुल व्याकुळ दर्शना
ये ना कधी तरी पुन्हा

पी माझ्याच कपातुनि चहा
ऐकव तव कविता नव्या
नायका, रसिका, मोहना
लाव ना पाल्हाळ पुन्हा
ये ना कधी तरी पुन्हा

म्हण परत परत मला
दमला का माझ्या फुला
मी तुला अन् तूच मला
राहि जपुनि माझ्या मना
ये ना कधी तरी पुन्हा

पुन्हा अनुभवू जोडीनं
ते गेलेले रात दिन
ते गीत जुळवू पुन्हा
तो राग आळवू जुना
ये ना कधी तरी पुन्हा

Friday, February 15, 2008

जीवन

असंच असतं जीवन
ते उगवतं फुलतं फळतं
मातीत मिसळतं परत परत
परत नव्यानं उगवायला

नव्यानं उगवतं अधिक शक्ती घेऊन
नवीन गुणचिन्ह रुजवायला
होत जातं अधिक अधिक छान
अधिक अधिक शक्तिवान
त्याच्या वाटेत अडसर असणा-यांचं
ते राखत नाही मान
त्यांना बाजूला सारून पुढे जायचं ठेवतं भान

असंच असतं जीवन
मार्ग काढून पुढे जायचं
जो पुढे गेला तोच जिंकला
असंच सा-यांनी म्हणायचं

Monday, February 4, 2008

साद

हलकेच घातलेली ती साद आली कानी
अन् दूर वर कुठेशी ती शीळ घुमली रानी
रानात पाखरांनी केलाच किलबिलाट
अन् आम्र-मंजरींनी केली सुगंधी वाट
बघ वाहू लागला तो स्वच्छंद मंद वारा
पाण्यास स्पर्शुनी तो कां थरथरे किनारा

त्या हरिण शावकांनी केल्यात उंच माना
कोकीळ ही सुरेल त्या घेऊ लागे ताना
अन् कोवळे किरण हे बघ उजळती धरेला
त्या केशरी छटा ही रंगतात अंबराला
ही प्रीत तुझी माझी का भावली निसर्गा
जणु हात धरित्रीचे बघ टेकलेत स्वर्गा
हे भाव विश्व अपुले ह्रदयात जपुनि ठेवी
मग स्वप्निच्या फुलांना सुगंध मंद येई

Tuesday, January 29, 2008

किमया


चांदण्याचे पंख लागलेय आज मनाला
उमलले आहेत लाखो लाख गुलाब
श्रावणाच्या धारांत नाहून निघालय बेटं मन
लोळतंय हिरवळीवर खुशाल चाखत कोवळं ऊन
सारे सारे शब्द पडताहेत कानावर अमृत होऊन
सा-यांच्या नजरा करताहेत वर्षाव प्रेमाचा
कशाची ही किमया कशाची ही जादू
कुणाला विचारू कुणाला सांगू
पण गरजच नाहीय त्याची
जाणतेय मीच माझी
आज होणाराय ना आपली भेट
संध्याकाळ पासून रात्री पर्यंत थेट.

Sunday, January 20, 2008

माझं मन

माझं मन व्हावं विशाल अंगण
खेळावी त्यात माझी नाती गोती

माझं मन व्हावं चिमणं पाखरू
भरा-या माराव्या दूर दूर किती


माझं मन व्हावं शीतल चांदणं
सुखवावं त्यांना जवळ जे येती

माझं मन व्हावं सूर्याचा किरण
पोचवावी ऊब जिथे गोठलीय प्रीति

माझं मन व्हावं हिरवी हिरवळ
क्षुब्ध नयनी थंडावा आणावा अति

माझं मन व्हावं गगनाची निळाई
अपार जयाचा विस्तार किती

माझं मन व्हावं सागर अथांग
सामावून घ्याव्या सा-या रीती नीति

माझं मन व्हावं तरल तरल
आणि मला यावी त्याचीच प्रचीति