Saturday, May 23, 2015

नातीं



नात्यांना जपावं हळुवार
ती असतात
बकुळ फुलां सारखी
कोमेजली तरी
सुवासच देतात।

नात्यां करता
घ्यावी थोडी तोशीस
झिजावं चंदना सारखं
मग ती कसा सुगंध
पसरतात।

नाती जपावी पुस्तकातल्या
गुलाबा सारखी
मग कधी तरी
तीं आठवणींचा
ओलावा देऊन जातात।

नाती ठेवावीत ताजी
मनांतल्या ओलाव्यात
मग ती कशी अलगद
उमलतात।

ही मनाची नाती जोपासावीत
कधी मधी मग
भेट जेंव्हा व्हावी
कसा अचानक आनंद
देऊन जातात।








Tuesday, June 17, 2014

रात्र आणि दिवस














रात्र सावळी सुंदर
काळाभोर केशभार
नेसे काळी चंद्रकळा
हिरे मोती अलंकार।

कोण तिचा प्रियकर
कोणा साठी हा श्रृंगार
कोणाची पाहते वाट
आहे कोण तो येणार।

रात्र जागविते रात्र
पुन्हा वेळावते मान
आला का घेते चाहूल
दश दिशा झाल्या कान।

वाट पाहून पाहून
निशा राणि पेंगुळली
आणि तिच्या प्रांगणात
उषा सुंदरी पातली।

आत आला रविराज
भेटे प्रिय उषा राणि
दिवसाची सुरवात
होते त्यांच्याच मीलनी।

चालतसे लपंडाव
रात्र दिवसाचा असा
रविराज येता येता
करते प्रयाण निशा।


Tuesday, May 13, 2014

कोवळा अंकुर

कोवळा अंकुर आहे ग मी आई तुझ्या कुशीतली
तुझ्या सारखीच होणार ना मी ही स्त्री सखी जगातली
नको ना कुणाला खुडायला देऊ, सांभाळ गS स्वतःला
येऊ दे, येऊ दे, येऊ दे ना आई ह्या तुझ्या जगी मला।
प्रकाशात नाहू दे
श्वास मोठा घेऊ दे
तुला पाहू दे ना डोळे भरून
मांडीवर झोपू दे
सायी चे हात तुझे
फिरव ग अंगा वरून।

तुझे धरुनि बोट
चालीन मी वाट
घेईन अवघे जग जिंकून
तू मला मी तुला
दोघी एकमेकी ला
सांभाळू आधार देऊन
तू आत्ता येऊ दे मला
स्मरीन मी ही हे उपकार
अन् जेंव्हा तुला लागेल मदत
सांभाळीन मी ही तुला।

Saturday, August 3, 2013

तोचि आहे सुख

तोचि आहे सुख, दुःख आहे तोचि,
तोचि रे सुंदर, कुरूप ही तोचि ।

तोच बुध्दिमान, गावंढा ही तोचि,
तोचि रे नागर, ग्रामस्थ ही तोचि ।

तोचि रे सरळ, वाकुडा ही तोचि,
तोचि रे कठोर, मृदुल ही तोचि ।

तोचि सदाचारी दुर्जन ही तोचि,
तोचि खल कामी, सज्जन ही तोचि ।

क्रोध,काम, मद, मत्सर ही तोचि
लोभ, मोह, राग, प्रेम रस तोचि ।

तोचि आहे अग्नि, जळ आहे तोचि,
पृथ्वी, वायु, नभ सर्व आहे तोचि ।

अंतरिक्ष आणि पाताळ ही तोचि
सर्व ह्या जगाचा प्रतिपाळ तोचि

तोचि आहे तू अन् मी ही आहे तोचि
अखिल जगती भरला रे तोचि । 

Wednesday, March 27, 2013

होळी




उधळित रग गुलाल कन्हैया खेळे होळी
गोकुळ हे झाले दंग, भरली मस्ती ची झोळी  ।

राधिका वाचवित अंग गोपिंच्या आड होतसे
सावरी त्वरेने पदर, झाकते ओली चोळी ।

पिचकारी उडवित येति गोप अन कृष्ण मुरारी
धावती गोपीं च्या पाठी मोडती नीटस ओळी ।

हा रास रंग पाहुनि लोक हे भान विसरले
जय जय हो राधा-कृष्ण, बोलती एकच बोली ।

कृष्ण रंगी भिजती आज पहा सारे ब्रिजवासी
जाहले कृष्णमय जगत, भक्ती ची पिकली पोळी ।

Sunday, November 25, 2012

कांही क्षणिका


क्षितिजा वर सूर्य बिंब
चाललं सागरांत
संपली भेट


संध्यारंग उधळले
सोनेरी लाल गुलाबी
जातानांच हसू


येणार लांब रात्र
पण असेल चंद्र
तुझी आठवण


पेंगुळली गात्रे
नीज तरी ना ये
कशी ही असोशी


पक्षांची किलबिल
मनाची चलबिचल
होणार का भेट ।

गर्दी गडबड
वाहने जोरात
मनाच्या वेगीं


कामा ची लगबग
जिवाची तगमग
आहेस का तू


बॉस ची वर्दी
डेडलाइन ची गर्दी
कुठली भेट ।

Saturday, October 6, 2012

बाळ


बाळ हसरं हसरं
माझं लाडाचं झिपरं
त्याचे काळे भोर डोळे
नाक नकटं अपरं ।

त्याचे मऊ मऊ गाल
पाय हात मऊ मऊ
सायी सरखं ग अंग
किती किती पापे घेऊ ।

दंगा करी किती बाळ
नाचे वाजवीत वाळा
झोप नाही ग डोळ्याला
करी सारा वेळ चाळा ।

माझा गोविंद गोपाळ
करी दही दूध काला
तीट लावा हळू गाली
दृष्ट नच लागो ह्याला ।

Saturday, September 8, 2012

प्रश्न आणि उत्तरं



किती आणि कसं, कुठे आणि केंव्हा
कधी आणि कुणी काय करावं
कसे कसे पडतात प्रश्न मनाला

कुणी द्यावी त्याची उत्तरं
कुणालाच तर माहीत नसतांत
मग सगळं आपलं अनुमान

खरं खरं रोक ठोक काहींच नाही
काय करावं, शोधावी उत्तरं कि
चालू द्यावं सर्व जसं चाललंय

मिटून कवाडं बाहेरची
डोकावलं आंत, तर
मिळतील ती उत्तरं


Thursday, June 21, 2012

रीत


आज अचानक पाहिलं तर घरटं रिकाम होतं
परवा परवा पर्यंत तर मोठं होत आलेलं एक पिलू त्यात होतं
माझी चाहूल लागताच उडून जाणारी त्याची आई
त्याला प्रेमाने दाणा भरवायची .
मी पण काळजी घ्यायची पावलांचा आवाज होऊ नये ह्याची.
कधी कधी खिडकीच्या काचेतून बघायची
लहानशी चोच मोठ्ठी उघडून
दाणा घ्यायच्या प्रयत्नांत असलेल ते पिलू .
मला नादच लागला होता त्याचा,
पक्षिणिचं ते संगोपन बघायचा.
दिवसे दिवस मोठं होत जाणारं
ते पिलु बघायचा.
दोनच दिवस मधे गेले
जमलंच नाही ते बघायला
अन् आज घरटं रिकामं
किती जरी मला ओकं बोकं वाटलं
तरी रीतच आहे ही जीवनाची
माझी ही पिलं उडून नाही का गेली ?

Tuesday, April 17, 2012

क्षितिजाच्या पलीकडे

तुझी दुःखाची तलम चादर
त्यांत विणलेली शब्दांची कोमल फुलें
हात लावायला धजावत नाही मन
पण एक अपूर्व आकर्षण मात्र वाटतं
संध्याकाळची गूढ वेळ अन् तिचं तुझं नातं
नितांत वैयक्तिक पण तरीही
केंव्हा तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं
ती तलम चादर पांघरूनच वावरलास सदैव
अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर
अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।

Thursday, March 1, 2012

जीवनाचे सार

विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,
प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।

काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,
राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।

भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि
अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।

विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया
घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।

सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी
मी सुखी होईन मित्रा, तू ही सुखी होवून जा ।

सर्व काही होत नसते, वाटते व्हावे जसे,
जीवनाचे सार हे, तू ही सख्या समजून जा ।

भेट झाली जीवनी जर फिरुनि केंव्हा तरी
मित्र म्हणुनच भेटू या, प्रीतिला विसरून जा ।

Sunday, November 6, 2011

प्रेमाला रंग असावा



प्रेमाला रंग असावा,
प्रेमाला गंध असावा,
प्रेम मन मोरच व्हावा,
थुई थुई नाचत जावा ।

अंगणी जुई फुलावी,
पारिजात वृष्टी व्हावी,
वा-याच्या झुळुके सरसा
टप,टप,टप पाउस यावा ।

गुलाबी अन सोनेरी,
चांदण्या सम चंदेरी,
हरळीच्या हिरवाईसा
चहूकडे पसरत जावा ।

सोनेरी सकाळ व्हावी,
रुपेरी रात्र असावी,
केशरी सायंकाळी
अचानक प्रियकर यावा ।

पक्षांची किलबिल गाणी,
भ्रमरांची मधु गुणगुणणी
प्रेमाचा मृदु कलरव तो
ह्रदयी अनुनादत रहावा ।

Saturday, August 6, 2011

आठवणींच्या चिमण्या



आठवणींच्या चिमण्या
भिरभिरतात मनाच्या अंगणांत
टिपतात दाणे मागल्या क्षणांचे,
दिवसांचे, महिन्यांचे अन वर्षांचे सुध्दा .
केंव्हा घेतला होता आईनं पापा
गालांवरचे अश्रू पुसून
किंवा दिला होता निळा पेन बाबांनी
मला आवडतो म्हणून
केंव्हा ऐकता ऐकता वाटलं होतं
अपरूप दादाच्या कवितांचं
केंव्हा वाटली होती असूया
अक्काची न बोलता सारं कळण्याची
केंव्हा केली होती अण्णाशी भांडा भांडी
केंव्हा घातला होता मिंदू ला धपाटा
केंव्हा गैलरीतून बघितलं होतं त्या देखण्याला
केंव्हा पुढे केला होता बोरं भरला हात
केंव्हा झालं होतं कौतुक, अन्
केंव्हा झाला होता राग राग.
केंव्हा पडल्या होत्या अक्षता अन् कळसाचं पाणी
केंव्हां फुलली होती बाग
केंव्हा लावलं होतं प्रेमाचं रोप
केव्हा बहरलं ते फुला फळांनी
चिमण्या बाळाच्या चिमण्या मुठी
पावलांच्या मऊ मऊ करंज्या
काजळ, तीट, जॉन्सन बेबी पावडर,
अमूल स्प्रे
वाढती पाउलं, लहान होणारे बूट,कपडे
त्यांचं मोठं अन वेगळं होणं
किती किती दाणे संपतच नाहीत
मीच येते अचानक भानावर, अन् येते अंगणातून घरांत .

Saturday, March 5, 2011

आस

रात्रीतल्या सुरांचे आवर्त क्षीण झाले
माझे ही हात थकले अन् ताल स्तब्ध झाले ।

शब्दच पेंगुळले, आवाज ते विराले
अन् नाद ब्रम्ह अवघे जणु काय मूक झाले ।

कुठल्या सुरेल गावीं, ही पाखरे स्वरांची
गेली उडून आणि हे गाव दग्ध झाले ।

ही शांतता भकास जाणीव गोठलेली
हे बधिर मूक कुठले गावांत आज आले ।

गेलीस तू निघून, मी एकटाच उरलो
अस्तित्व आज माझे मी ही नकारलेले ।

कुठल्याही क्षणि ते येतील स्वर फिरून
येशील तू ही गात ते गीत विसरलेले ।

ही आस मम मनांत बघ तेवतेच आहे
तू ही तिला पुरव ना ते स्नेह राखलेले ।

Thursday, November 4, 2010

दिवाळी

काळी जरतारी रात्र
रात्र अशी अवसेची
लख लख लाख दिवे
रात्र भासे दिवसाची ।
दारी तोरण स्वागता
अंगणांत रंगावली
शोभे आकाश कंदील
अन् दिव्यांच्या आवली ।
पूजेची तयारी सारी
फुलें उदबत्त्या दिवे
पंच पक्वान्नाची ताटे
गंध, सुगंध बरवे ।
नववधू लक्षुमी ही
आज सजली झोकांत
नाकी नथ, गळा सरी
तोडे, पाटल्या हातांत ।
पैठणी ल्यायली नवी
मोर राघू सजलेले
सासू सासरे दीरांच्या
नेत्री कौतुक दाटले ।
आनंदी आनंद माझ्या
अंगणात ही मावेना
ओसंडून वाही सुख
त्याचा जोर सोसवेना ।
आज दिवाळी च्या दिनी
तुला मागते लक्षुमी
घरी दारी सर्व दूर
राहो आनंद दाटूनी ।
दृष्ट न लागो कुणाची
माझ्या सुखाच्या संसारी
राहो सर्वजण सुखी
माझे घरी अन् शेजारी ।

Monday, October 4, 2010

मन

मन सुसाट पळते
मला नको तिथे नेते
नको नको मी म्हणता
नको तेच दाखवते ।

मन माजवते मनीं
किती काहूर काहूर
नाही नही ते विचार
करून हुर हूर ।

मन किती हे चपळ
जसे हरिण हरिण
क्षणि इथे क्षणि तिथे
ह्याचे कठिण कठिण ।

मन नाठाळ नदी से
वाहावते दूर दूर
बांध तोडून आणते
सर्वत्र महापूर ।

मन वा-या संगे नाचे
मन भिजे पावसांत
मन कधि हो ढगाळ
कधी तापते उन्हांत ।

ह्या मनाचे नाही खरे
ह्याचा लागेच ना ठाव
कधी वाटे जवळचे
कधी राखे दुजा भाव ।

Saturday, September 11, 2010

गणपति बाप्पा मोरया



लागला रे होता केंव्हांचाच ध्यास
आज माझी आस पुरविली ।
किती दिवसांनी आला देवा घरी
आनंद संसारी दाटियेला ।
यावे यावे देवा, स्वागत तुमचे
दाराशी तोरण नारळाचे ।
पाया वर घालू दूध आणि पाणी
प्रवासाचा शीण घालवाया ।
आसन देऊन स्थापना करूया
मखर सुंदर सजविले ।
सुगंधी जलाने स्नान करवू या
नवी आभरणें तुज लागी ।
चंदनाची उटी कस्तुरी तिलक
मस्तकी शोभती जवा फुले ।
दुर्वांची जुडी देईल थंडावा
मोदक प्रसादा ठेवियले ।
पूजा, प्रार्थना, धूपाचा सुगंध
आरती ओवाळू पंचदीप ।
गोड हे मानावे, आतिथ्य रे बाप्पा
आता तूज घालू दंडवत ।

Saturday, September 4, 2010

पाऊस कविता

’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि माझ्या (’गोळे काका’ यांच्या) हाती तिची सूत्रे दिली.

मी माझी साखळी जोडून, आशा जोगळेकर आणि तुषार जोशी यांना खो देत आहे.

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

प्रशांतचे कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशाआंतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

क्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

गोळे काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात!

नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

.तुषार चे उत्तर छंद भुजंग प्रयात्

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

तुषार चा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.

माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली,महक आणि शामली ला

महक चे उत्तर
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.
http://mehhekk.wordpress.com/

Thursday, August 19, 2010

प्राप्य

माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते
मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।
जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या
त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।
हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला
जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।
माझेच कर्म सारे माझ्या समोर आले
मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।
देशात गांजलेली जनता उपाशी असता
चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।
आतंक आज व्यापी देशास सर्व दूर
तरी किती, कुठे, कुणाला, रे काळजी रहाते ।
नुसता विचार करुनी घडणार नाही कांही
चल ऊठ अता मित्रा, ये घडवू देशातें ।

Tuesday, August 3, 2010

नगण्य



असलो जरी कण धुळिचा
एकदा चमकेन लखकन्
असलो जरि तृण इवले
पाउलां जाईन सुखवुन ।
ह्या अफाट ब्रम्हांडी
नगण्य अस्तित्व जरी
सहवासी होणा-यां
देईन साथ रसरसून ।
जरी जग हे बदलाया
पडतिल बाहू अपुरे
मुंगीच्या एव्हढा
प्रयास नक्की घडविन ।
जरी माझे नाव कुठे
दिसणार नाही कुणा
पण माझा हातभार
गेला असेल स्पर्शुन ।
अन् जग हे सोडतां
अश्रू न ढाळो कुणि ही
पण माझ्या चेहे-या वर
समाधान नक्की पसरिन ।