Friday, September 5, 2008

आठवणी

आठवणींच्या रिमझिम धारा
देती तप्त जिवा थंडावा
त्यातच मग हरवून जाता
वर्तमान कां नच विसरावा

बालपणीचे घरकुल अपुले
आई दादा ताई भाई
आणि छबकडे मिंदू नाना
गडबड बडबड घाई घाई

मी अन अण्णा अधले मधले
कुणी ही थापटा असले तबले
पण त्या कडुलिंबी फांदी ला
लोंबत असत मधाचे बुधले

ते बालपण ती तरुणाई
नव्या नव्या ची किती नवलाई
शाळा संपुन कधी उगवली
कॉलेजाची अपूर्वाई

ती कॉलेजाची नवलाई
कळले नाही कधी संपली
कधी सीनीयर झालो आम्ही
अन् पदवी ही हाती पडली

अन् पदव्युत्तर वधू परीक्षा
तीही पडली पार कधीची
सून, नववधू , काकू, वहिनी
नवीन नातीं नव जन्माची

नवरा,सासू तान्ही बाळें
उस्तवारी करणें सगळ्यांची
त्याच मधे मग हरपुन गेली
गंमत जंमत ती रात्रींची

हे सगळे करताना आले
नोकरी चे ते जू मानेवर
कधी स्वत: मी अडकवले ते
माझे मला न कळे आजवर

शिक्षण अन् लग्ने ही मुलांची
झाली ती थाटामाटाने
ती ही पाखरें उडून गेली
अपुल्या अपुल्या नव वाटेने

आज अता निवांत लाभता
आम्ही दोघे सायंकाळी
आठवीत बसतो त्या गोष्टी
घडल्या होत्या ज्या सकाळी

संसृतिच्या स्थूलांत कधी कधी
स्मृति मधाचे बिंदु चाखतो
गोडी मध्ये आठवणींच्या
दोघे मग हरवून जातो.

4 comments:

प्रशांत said...

ही कविता नसून माणसाच्या आयुष्यातल्या वाटचालीचा काव्यरूपी सांरांश आहे असं वाटतं.

पण त्या कडुलिंबी फांदी ला
लोंबत असत मधाचे बुधले

मस्तच!

एकंदरीत कमीअधिक फरकाने असं असतं का प्रत्येकाचं आयुष्य?

आशा जोगळेकर said...

Thanks prashant

प्रशांत said...

तुम्हाला साखळी हायकूसाठी खॊ दिलाय बघा.

princess said...

आशाताई कित्ती सुरेख लिहिता हो तुम्ही. कविता वाचतांना आईच आली डोळ्यासमोर....