Tuesday, June 16, 2009

पाऊस

पावसाळी आसमंत
कसे भरुनि आले
निळे, सावळे, काळे
ढग खवळुनि आले ।

करती गर्जना प्रचंड
वा-याचा अन् मृदंग
मत्त हत्तीच जणु
डुलत झुलत आले ।

गडगडाट, कडकडाट,
चमचमाट, लखलखाट
तडिता चाबुक उडवित
वरुण देव आले ।

कोसळती जलधारा
अन् प्रचंड तो वारा
जल थल जणु होय एक
तन, नव वसन ल्याले ।

शमले वादळ अवचित्
दिशादिशा हो पुलकित्
अभ्र छेदुनि,
रविराज प्रगट झाले ।

3 comments:

दिलीप कवठेकर said...

ही कविता वाचून एक गाणे आठवले,जे मी आत्ताच पहिल्यांदा ऐकले-

गारवा...

तसे, मी २० जून ला सायंकाळी रायगढा च्या किल्ल्या वर होतो जेव्हां त्या बजूला पहिला वहिला पाऊस पडला होता.

अगदी असेच प्रत्यक्ष घडले जसे ह्या कवितेत आहे.

mehek said...

कोसळती जलधारा
अन् प्रचंड तो वारा
जल थल जणु होय एक
तन, नव वसन ल्याले ।
khup surekh varnan

P A Ramchandra said...

तुमची अनुदिनी आवडली. ही कविता आणि "अभ्र" ही कविता विशेष आवडल्या. नियमितपणे तुमच्या कविता वाचता येण्यासाठी ह्या ब्लॉगचे फीड सुरू करायला मला आवडेल. धन्यवाद.